Breaking

Tuesday, April 13, 2021

गडचिरोलीतील 'हत्तीकँम्प'चं पर्यटकांना आकर्षण; नेमका काय आहे हा प्रकल्प? https://ift.tt/2OQnhYO

गडचिरोली: ऐरवी गडचिरोलीचे नाव काढलं की 'नक्षलवादी' एवढेच चित्र आपुसकपणे नजरेसमोर येते. तर जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर हे नाव उच्चारताच अंगावर अनामिक भीतीने शहारा येतो. कमलापूरची आजवरची ओळख केवळ नक्षलवाद्यांचे माहेरघर अशीच आहे. याला कारणही तसंच. नक्षलवाद्यांनी १९८० च्या सुमारास जिल्ह्यात शिरकाव केल्यानंतर १९८४ मध्ये पहिली सभा कमलापूर येथेच घेतली. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेलंगणाच्या बाहेर पहिला यशस्वी प्रयत्न कमलापूर मध्ये झाला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांचे माहेरघर हीच ओळख कमलापूरला चिकटली. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांनी बरबटलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 'पर्यटन' ही कल्पनाही कोणी सहसा करत नाही. परंतु गडचिरोली जिल्ह्यातल्या काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्यानंतर कोणीही पर्यटक त्या स्थळांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही ही वस्तुस्थिती आहे. कमलापूरचा हत्ती कॅम्प ही अशाच एक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. सर्कस मधील हत्ती आधीच्या पिढ्यांनी अनेकवेळा पाहिले असेल. पण आता सर्कशीचे प्रमाण कमी झाल्याने नवीन पिढीला प्रत्यक्षात हत्ती पहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे. त्यामुळेच की काय गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरमध्ये असलेल्या वन विभागाच्या शासकीय हत्ती कॅम्पचे आकर्षण वाढत आहे. येथे एक-दोन नाही तर लहान-मोठे मिळून तब्बल नऊ हत्ती असलेला हा महाराष्ट्र राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प आहे. येथे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हत्तीकँम्प म्हणून कमलपूरचा नावलौकिक होत आहे. तब्बल ५५ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाने जंगलातील लाकडं वाहण्याकरिता एक हत्तीण आणली होती. नंतर एक हत्ती आणण्यात आला यांची वंशावळ वाढत गेली आणि हा हत्ती कॅम्प अस्तित्वात आला. कमलापूर येथील वन विभागाच्या शासकीय हत्ती कॅम्प मध्ये मंगला, अजित, बसंती, प्रियंका, गणेश, राणी, रूपा, सही आणि अर्जुन असे एकूण नऊ हत्ती आहेत. मागील बऱ्याच वर्षापासून लाकडं वाहण्याचे काम कमी झाले आहे. पण या हत्तींना पाहण्यासाठी सहकुटुंब येणाऱ्या पर्यटकांची संख्या मात्र वाढतच आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून तब्बल १५० किलोमीटर अंतरावर असलेला हा हत्ती कॅम्प पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थळ ठरत आहे. पर्यटकांमध्ये आकर्षण आणि उत्सुकता पाहता वनविभागाने तब्बल १ कोटी ३६ लाख रुपयांचा निधीतुन या ठिकाणी मूलभूत सुविधा व सौंदर्यीकरणाचे काम सुरु केले होते. जवळपास अर्धे काम पूर्ण झाले असतानाच २ डिसेंबर २०१९ रोजी नक्षलवाद्यांनी हत्ती कॅम्पला लक्ष करत बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तोडफोड करत पर्यटन स्थळाला विरोध केला. मात्र,येथे पर्यटकांची संख्या कमी झाली नाही. वनविभागाच्या हत्ती कॅम्प परिसरात तीन डोंगर होते. या डोंगराच्या पायथ्याशी मोठा तलाव आहे. रखरखत्या उन्हात हिरवेगार निसर्गसौंदर्य केवळ नजरेलाच नव्हे तर मनालाही गारवा देऊन जाते. हिवाळ्याच्या दिवसात तर येथील सौंदर्य अधिक खुलते धुक्यात हरविलेले डोंगरमाथे जणू तलावाच्या पाण्यावर जमलेली धुक्याची चादर काश्मीरची आठवण करून देते. त्यामुळेच दिवसेंदिवस येथे पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. येथील हत्तींना आपल्या हाताने चारा भरण्यापासून तर त्यांच्यासोबत फोटो काढण्या पर्यंतचा मनमुराद आनंद पर्यटक लुटतात. पावसाळ्यात तर या परिसरातील धबधबे ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांची संख्या अधिकच जाणवते. याव्यतिरिक्त गडचिरोली जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. फक्त पर्यटन स्थळांचा भरवश्यावरच हा जिल्हा आर्थिक क्षेत्रात प्रचंड मोठी झेप घेऊ शकतो. पण जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन स्थळे नक्षलग्रस्त भागात असून त्यावर नक्षलवाद्यांची हिंसक सावली असल्याने या स्थळांचा विकास एक दिवसास्वप्नच होऊन बसले आहे. कुठलीही सोयीसुविधा नसतांनाही बरेच पर्यटक जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी भेटी देतात. कमलापूर येथील हत्तीकँम्प मुळे केवळ गावाचीच नव्हे तर जिल्ह्याची जुनी ओळख पुसून नवी ओळख मिळत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हत्तीकॅम्प म्हणून कमलापूरचा नावलौकिक होत आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/32cKgQO

No comments:

Post a Comment