Breaking

Saturday, April 10, 2021

मुंबईकरांना गतवर्षीच्या लॉकडाउनचीच आठवण https://ift.tt/3saY9cG

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईत करोनाचा कहर वाढत असतानाच राज्य सरकारने शनिवार, रविवारी लागू केलेल्या वीकेण्ड लॉकडाउनला सकारात्मक प्रतिसाद दिला. शुक्रवारी रात्री आठनंतर लॉकडाउनचा अंमल सुरू झाला आणि मुंबईत शांतता पसरू लागली. शनिवारी संपूर्ण मुंबईत अपवाद वगळता आणि काही प्रमाणात वाहनांची, लोकांची वर्दळ वगळता बहुतांश ठिकाणी शांतता होती. एकूण करोनाची सद्यस्थिती पाहून जवळपास सगळ्याच मुंबईकरांनीही आपत्कालीन परिस्थितीत स्वत:हून घराबाहेर पडणे टाळले. दक्षिण मुंबईसह धारावी, दादर, वरळी, सायन वांद्रे लिंक रोड, भांडुप, घाटकोपर, अंधेरी, मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली आदी सर्वच भागात यशस्वी ठरला. मुंबईत पुन्हा लॉकडाउनच्या घोषणेने मुंबईकरांच्या पोटात गोळा असून त्याचेच प्रत्यंतर शनिवारी दिवसभरात दिसत होते. शुक्रवारी रात्रीपासूनच शहर, उपनगरांमध्ये रस्त्यांवरील वाहतूक कमी कमी होत गेली आणि पाठोपाठ माणसांचा वावरही कमी झाला. शुक्रवारी रात्री आठनंतर पोलिसांच्या व्हॅन, गाड्या पुन्हा एकदा लॉकडाउन आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी गस्त घालत होत्या. कुठेही गर्दी होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. गेल्या वर्षानंतर शहरात नव्याने लॉकडाउनची घोषणा झाल्याने त्यास नेमका कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शुक्रवार रात्रीपासून शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट पहायला मिळाला तो शनिवार रात्रीपर्यंत कायम राहिला. प्रचंड गर्दीची केंद्रे असलेल्या धारावीतील ९० फूट, ६० फूट, सायन-वांद्रे लिंक रोड, कुर्ला, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवलीतील गणपत पाटीलनगर झोपडपट्टीसह सगळ्याच भागात शांततेचा अनुभव येत गेला. वरळी, ताडदेव, सायन, भांडुप, जोगेश्वरी, प्रभादेवी, गोवंडी, मानखुर्द आदी भागांमध्येही शुकशुकाट होता. काही भागांमध्ये वाहतूक आणि रस्त्यांवर लोकांची वर्दळ काही प्रमाणात असली तरीही ती संख्या कमी होती. दुकानांमध्ये वस्तू घेण्यासाठी ये-जा लॉकडाउनमध्ये मेडिकलसह ज्या दुकानांना परवानगी दिली होती, तिथे वस्तू घेण्यासाठी लोकांची ये-जा सुरू होती. पाव, बेकरी उत्पादन, औषधांसह अन्य वस्तू घेण्यासाठी मुंबईकर बाहेर पडत होते. नागरी वसाहतींमध्ये हे दृश्य दिवसभर दिसत होते. शहरातील व्यवहार थांबले बाजारपेठा, फेरीवाले, उद्योगव्यवसाय, मॉल, सरकारी कार्यालये, सुमद्रकिनारे, मंदिरे सगळेच बंद असल्याने शहरात शुकशुकाट पसरण्यास वेळ लागला नाही. खरेदी-विक्री थांबल्याने आणि पोलिस-पालिकेच्या कारवाईच्या भीतीने मुंबईकरांनी घरातच राहणे पसंत केले. अत्यावश्यक सेवा सुरू अत्यावश्यक सेवा वगळता इतर क्षेत्र बंद असले तरीही रिक्षा, टॅक्सी, बेस्ट, लोकल सुरू असल्याने कर्मचाऱ्यांचे हाल झाले नाहीत. त्याचवेळी, रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने परप्रांतीय कामगार अधिक संख्येने घरी परतत असल्याचे दिसून आले. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसकडे गर्दी झाली होती. ३ हजारांहून बस धावल्या आपत्कालीन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमाने दिवसभरात ३ हजारांहून अधिक बस सेवा चालविल्या. त्यात लोकल सेवाही उपलब्ध असल्याने गेल्यावर्षीप्रमाणे आपत्कालीन कर्मचाऱ्यांचे हाल झाले नाहीत. तसेच, प्रवासात सुरक्षित अंतरही राखले जात असल्याने चालक, कंडक्टरदेखील समाधान मानत होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/322AzUO

No comments:

Post a Comment