म. टा. प्रतिनिधी, मुंबई विक्रमी स्तरावर पोहोचलेले खाद्यतेलाचे दर आता नियंत्रणात येण्याची आशा निर्माण झाली आहे. एकीकडे मुंबईतील बंदरांवरील आयातीत वाढ झाली असताना, दुसरीकडे मागणीही घटली आहे. परिणामी आठवडाभरात घाऊक दरांत २५ टक्क्यांची घट झाली आहे. त्यातून किरकोळ दर अधिक न वाढता स्थिरावले आहेत. मुंबईत खाद्यतेलाचे दर सध्या किमान १७० ते २५० रुपये प्रतिलिटरच्या घरात गेले आहेत. हेच दर दोन महिन्यांपूर्वी ११० ते १५० रुपयांदरम्यान होते. स्वदेशी खाद्यतेलाचे घटलेले उत्पादन, कमी झालेली आयात व शुद्ध तेलाच्या आयातीवरील बंधने, यामुळे हे दर वधारले आहेत. पण, आता त्यात काही अंशी दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले, 'देशात पामतेलाला सर्वाधिक मागणी असते. पामतेलाची १०० टक्के आयात करावी लागते. करोना तसेच अन्य कारणांनी फेब्रुवारी ते मेच्या मध्यापर्यंत ही आयात ३५ ते ४० टक्के घटली होती. त्या देशांमधील तेलाचे उत्पादन आता वाढू लागले आहे. यामुळेच घाऊक दरात मोठी घसरण दिसून येत आहे. पुढील आठवड्यापासून त्याचे परिणाम किरकोळ बाजारात दिसण्याची अपेक्षा आहे.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2RiV9i2
No comments:
Post a Comment