नवी दिल्लीः करोना संसर्ग पाहत रेल्वे मंत्रालयाने नियमित मेल आणि एक्स्प्रेस ट्रेन्स या विशेष गाड्या म्हणून चालवल्या होत्या. मात्र आता या ट्रेन्सच्या वाहतूक पुन्हा सामान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच मेल/एक्स्प्रेस स्पेशल आणि हॉलिडे स्पेशल ट्रेनची सेवा आता नेहमीच्या गाड्यांसारखी होणार आहे. या गाड्या पुन्हा नियमित क्रमांकाने धावतील. यामुळे विशेष ट्रेनचे भाडेही आता प्रवाशांना द्यावे लागणार नाही. आता या ट्रेनसाठी प्रवाशांना जुने नियमित भाडे लागू होणार आहे. सध्या स्पेशल ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा ३० टक्के जास्त भाडे आकारले जात आहे. रेल्वे मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. यासंदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत, असे मंत्रालयाने पत्रकात म्हटले आहे. या निर्णयानंतर येत्या काही दिवसांत १७०० हून अधिक गाड्या नियमित गाड्यांप्रमाणे पूर्ववत केल्या जातील. करोनाशी संबंधित खबरदारी आणि निर्बंध सर्व गाड्यांमध्ये लागू असतील असेही सांगण्यात आले आहे. अॅडव्हान्स बुकींग केलेल्या तिकीटांचे काय? बुकिंग करणाऱ्यांना रेल्वे तिकिटांचे कोणतेही अतिरिक्त भाडे आकारले जाणार नाही आणि कोणतेही पैसे परत केले जाणार नाहीत, असेही परिपत्रकात म्हटले आहे. विशेष भाडे रद्द केले जात असले तरी ट्रेनचे भाडे कोविडपूर्वी जे होते तेच राहील. ब्लँकेट, सवलत आणि पॅन्ट्रीची सुविधा पूर्वीसारखी दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. देशात करोनाचा संसर्ग पाहता २५ मार्च २०२० ला रेल्वे सेवा तात्पुरती बंद करण्यात आली. करोना संसर्गामुळे १६६ वर्षात पहिल्यांदाच भारतीय रेल्वेची चाके थांबली. या काळात रेल्वेने मालाची वाहतूक सुरू होती. प्रवासी गाड्या बंद होत्या. यानंतर भारतीय रेल्वेने स्थलांतरीतांसाठी मे २०२० पूर्वी श्रमिक स्पेशल ट्रेन्स आणि नंतर स्पेशल ट्रेन्सच्या रूपात पुन्हा धावण्यास सुरवात केली. नियमित गाड्यांच्या संख्येत बदल करून त्या विशेष गाड्या म्हणून चालवण्यात आल्या.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3kxOax3
No comments:
Post a Comment