: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ८५.३१ टक्के मतदान झालं आहे. जिल्ह्यातील २ हजार ५७३ पैकी २ हजार १९५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आटपाडीत सर्वाधिक ९९.३८ टक्के तर सांगलीत सर्वात कमी ५३.२१ टक्के मतदान झाले. निवडणूक प्रचारात मतदारांच्या पळवापळवीच्या वादातून झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर मतदान शांततेत पार पडले. मंगळवारी (दि. २३) सकाळी आठ वाजता मिरजेत मतमोजणी सुरू होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी सोसायटी गटातील तीन जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे १८ जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. जिल्ह्यातील १२ मतदान केंद्रावर सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रावर उमेदवार कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सोसायटी गटातील सहलीला गेलेले मतदार थेट मतदान केंद्रावर पोहोचले. बँकेच्या निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. महाविकास आघाडीचे सहकार विकास पॅनेल, तर भाजपचे शेतकरी विकास पॅनेल रिंगणात होते. दोन्ही गटांकडून चुरशीने प्रचार झाला. त्यामुळे आता निकालाकडे लक्ष लागलं आहे. मतमोजणी मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी मिरज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी बचत भवनमध्ये होणार आहे. दरम्यान, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, बँकेचे विद्यमान अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, उपाध्यक्ष संग्रमसिंह देशमुख, विशाल पाटील, सत्यजित देशमुख, पृथ्वीराज पाटील यांच्यासह दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार की भाजप महाविकास आघाडीला शह देण्यात यशस्वी होणार, हे या निकालातून स्पष्ट होणार आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2ZcSU3Y
No comments:
Post a Comment