अहमदाबाद : फायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात एक चेंडू निकाल कसा बदलू शकतो, याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. कारण फायनलच्या पहिल्याच षटकात एक अशी गोष्ट घडली की त्यामुळेच शुभमन गिल हा मॅचविनर ठरू शकला. पहिल्या षटकात नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या...राजस्थानच्या धावसंख्येला गुजरातच्या संघाने चांगलाच लगाम लावला होता. त्यामुळे त्यांना गुजरातपुढे विजयासाठी १३१ धावाचे आव्हान ठेवता आले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्याच षटकात राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने गुजरातचा सलामीवीर वृद्धिमान साहाला पाच धावांवर बाद केले. त्यानंतर पाचव्या षटकात ट्रेंट बोल्टने गुजरातच्या मॅथ्यू वेडला ८ धावांवर बाद केले. गुजरातची यावेळी २ बाद २३ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी गिल हा संघाच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. राजस्थानसाठी पहिले षटक हा ट्रेंट बोल्ट टाकत होता. बोल्ट हा आपल्या पहिल्यात षटकात विकेट मिळवतो, हे सर्वांनाच माहिती आहे. यावेळी पहिल्या षटकात विकेट मिळवण्यासाठी त्याने शंभर टक्के प्रयत्न केला होता. पण राजस्थानच्या युजवेंद्र चहलने मोठी चूक केली आणि ही गोष्टच राजस्थानला सर्वात महाग पडल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बोल्टने गिलला चांगलेच चकवले होते. बोल्टचा चेंडू गिलला समजला नाही आणि त्याचा झेल उडावा होता. पण यावेळी चहलेने तो झेल सोडला आणि तिथेच सामना फिरल्याचे पाहायला मिळाले. कारण गिल हा त्यावेळी शून्यावर होता. त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे जर गिल त्यावेळी आऊट झाला असता तर नक्कीच गुजरातला मोठा धक्का बसला होता. पण या जीवदानाचा चांगलाच फायदा गिलने उचलला. गिलने यावेळी षटकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. गिलने या सामन्यात ४३ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४५ धावांची खेळी साकारली. गुजरातसाठी ही सर्वोत्तम खेळी ठरली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4P6RzFN
No comments:
Post a Comment