नवी दिल्ली : कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान आज (रविवारी) सकाळी अचनाक राजधानी दिल्लीस्थित परिसरात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात माथा टेकत यांना नमन केलं. उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यादरम्यान कोणत्याही पद्धतीची व्हीआयपी व्यवस्था तैनात करण्यात आली नव्हती. तसंच सामान्य जनतेला रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणत्याही पद्धतीचा बंदोबस्त किंवा ट्राफीक बॅरियर लावण्यात आले नव्हते. वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या गुरुद्वारा रकाबगंज इथल्या दौऱ्यात कोणतीही विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती. पंतप्रधानांच्या या भेटीबद्दल त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आलीय. 'जिथे श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या ऐतिहासिक गुरुद्वारा रकाबगंज साहिब गुरुद्वारात आज सकाळी मी प्रार्थना केली. मला अत्यंत प्रसन्न वाटलं. मी जगातील कोट्यावधी लोकांप्रमाणेच श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या दयाळूपणानं मलाही खूप प्रेरणा दिली आहे' अशी भावना पंतप्रधान मोदींनी आपल्या या भेटीनंतर व्यक्त केलीय. 'आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजींच्या ४०० व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत, ही गुरु साहेबांचीच कृपा आहे. चला, हा मंगल प्रसंगी ऐतिहासिक मार्गाने चिन्हांकित करू आणि श्री गुरु तेग बहादूरजी यांचा आदर्श साजरा करू' असंही म्हणत आपल्या या भेटीचे काही फोटोही पंतप्रधानांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. दरम्यान, कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाचा आज २५ वा दिवस आहे. करोना संक्रमण काळात तापमानाचा पारा ४ अंशांपर्यंत खाली पोहचलेला असताना शेतकरी या कायदा मागे घेण्याची मागणी करत रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. केंद्रीय मंत्र्यांसोबत झालेल्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या आंदोलकांत मुख्यत: पंजाब आणि हरयाणातल्या शीख समुदायातील शेतकऱ्यांचा सहभाग सर्वाधिक आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3rg6qgr
No comments:
Post a Comment