म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक स्वबळावर लढण्यात येईल. एकूण २२७ वॉर्डांमध्ये पक्षाच्या चिन्हावर आमचे सर्व उमेदवार लढतील, असे मुंबई विभागीय काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष, आमदार यांनी रविवारी जाहीर केले. याआधी राष्ट्रवादीसोबत राज्यात आघाडीत असतानाही मुंबईत काँग्रेस स्वतंत्रपणे लढली असून, यापुढेही ती स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरी जाईल, असे जगताप यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून शनिवारी उशिरा रात्री मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावर भाई जगताप यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर भाई जगताप यांनी सर्वांत प्रथम मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईतील पक्ष संघटना बळकट करून मुंबई काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न असून, या कामासाठी मुंबईतील जुने नेते, माजी खासदार आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत सध्या काँग्रेस विरोधी पक्षात आहे. ती भूमिका महापालिकेपुरती तशीच कायम ठेवण्यात येईल. मुंबईत कॅप्टन म्हणून पक्षातील बदल निश्चित करून दाखवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्यासोबत अनुभवी आणि चांगली टीम देण्यात आली आहे. नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार आहे. मुळात आमच्याकडे कोणीच नाराज नाही. हायकमांडने एकदा नियुक्त्या जाहीर केल्यानंतर सर्व एकदिलाने कामाला लागतील, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुंबईत काँग्रेसचा पारंपरिक मतदार मोठ्या संख्येने असून, वॉर्ड पातळीपर्यंत पक्षसंघटना बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यात आमच्या आघाडीचे सरकार असले तरी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम आम्ही करणार आहोत. - भाई जगताप, मुंबई काँग्रेस अध्यक्ष
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2WBq4VK
No comments:
Post a Comment