म. टा. प्रतिनिधी मुंबई : 'करोना लस घेतल्याशिवाय राज्यातील सर्वच जिल्हा-तालुक्यामध्ये एसटी बसने प्रवास करता येतो. मात्र लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही मुंबई लोकलमधून प्रवास करण्याला मुभा नाही', 'ओ शेठ...तुम्ही नादच केलाय थेट', असे म्हणत युवा वर्गाने राज्यातील सरकारचा मिम्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर निषेध नोंदवला आहे. सगळ्या गोष्टीवर सरकारकडून केवळ विचार केला जातो, मात्र त्या निर्णयाची अमलबजावणी होत नसल्याने समाजमाध्यमातून सरकारविरोधात प्रचंड नाराजी निर्माण होत आहे. लोकलमधील गर्दीमुळे करोना वाढेल, मात्र राजकीय कार्यक्रम शेकडोंच्या गर्दीत विनानिर्बंध सुरू आहेत. दुसरीकडे खासगी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू असून, स्वस्त आणि वेगवान असलेल्या मुंबई लोकलमध्ये मात्र सामान्यांना मुभा नाही. या दुटप्पी धोरणामुळे मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना रोज प्रवासात बराच वेळ खर्ची घालावा लागत आहे. पेट्रोल- डिझेल दरवाढीनंतर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा शेलक्या शब्दात नेटकऱ्यांनी समाचार घेतला होता. आता वेळखाऊ धोरण, निर्णय न घेता दिवस ढकलण्याच्या वृत्तीमुळे राज्य सरकार रडारवर असल्याचे दिसून येते. लशीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यास सरकार सकारात्मक असून प्रवासमुभा देण्याचा विचार देण्याचा सुरू आहे, अशी घोषणा राज्य सरकारमधील मंत्र्यांनी केली. यावरूनही संबंधित मंत्र्यांचे फोटो आणि घोषणा यावरून बनवलेले भन्नाट मिम्स सध्या व्हायरल होत आहे. सरकारी अर्थात एसटी बसमधून राज्यात कुठेही फिरता येते. यासाठी आरटीपीसीआर, करोना लस प्रमाणपत्र यापैकी कशाचीही गरज नसते. यातून मिळणारे उत्पन्न हे राज्य सरकारकडे जाते. करोना काळातील उत्पन्न भरून काढण्यासाठी शक्य तितके दिवस बंद ठेवून खासगी ट्रॅव्हल्स, आणि अन्य वाहने यांच्या माध्यमातून जोरदार वसुली करत असल्याचे मेसेजही समाजमाध्यमांवर फिरत आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lpiGur
No comments:
Post a Comment