म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्चला संपल्याने विद्यमान पालिका विसर्जित झाली आहे. त्यामुळे २२७ आणि पाच नामनिर्देशित अशी २३२ नगरसेवक पदे संपुष्टात आली आहेत. महापौरांसह स्थायी समिती आणि अन्य समित्यांची अध्यक्षपदेही पालिका निवडणूक होईपर्यंत अस्तित्वात राहणार नाहीत. आज, मंगळवार ८ मार्चपासून पालिकेच्या संपूर्ण कामकाजाची जबाबदारी प्रशासक या नात्याने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर आली आहे. त्यामुळे पालिकेत आयुक्तांकडे पर्यायाने प्रशासनाकडे संपूर्ण कारभार राहणार आहे. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन ८ मार्चपूर्वी नवीन महापौरांची निवड होणे अपेक्षित होते. मात्र, यंदा निवडणूक न झाल्यामुळे पालिकेत प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निवडणूक न झाल्याने विद्यमान नगरसेवकांची पदे कायद्यानुसार संपुष्टात आली आहेत. त्यामुळे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विविध वैधानिक समित्यांचे अध्यक्ष, प्रभाग समिती अध्यक्ष यांना देण्यात आलेली दालने बंद करण्यात आली असून, पालिकेकडून देण्यात आलेल्या गाड्याही काढून घेण्यात येणार आहेत. पक्षातील नगरसेवक संख्येनुसार सत्ताधारी शिवसेनेसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष यांना देण्यात आलेली पक्ष कार्यालये आता राजकीय पक्षांना वापरता येणार नाहीत. ही पक्ष कार्यालये प्रशासन लवकरच ताब्यात घेणार असल्याचे पालिकेच्या देखभाल विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत मंगळवारपासून प्रशासकीय कार्यवाही सुरू केली जाणार आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मुंबईतील प्रभागातील विकासकामे ही संबंधित विभागातील सहाय्यक आयुक्तांमार्फत होणार आहेत. मात्र, प्रभागातील विकासकामांचे सर्व प्रस्ताव मंजुरीसाठी आयुक्तांकडेच पाठवावे लागणार आहेत. निवडणूक होईपर्यंत मुंबईच्या विकासाची जबाबदारी पालिका प्रशासनाकडे राहणार आहे. नगरसेवक निधी प्रशासक आपल्या स्तरावर विकास कामांसाठी वापरू शकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. धोरणात्मक निर्णय सरकारमार्फत? स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती व अन्य समित्यांच्या बैठका होणार नसल्यामुळे या बैठकीत मांडले जाणारे विविध विकासकामांचे प्रस्ताव आता आयुक्त स्तरावर मंजूर करण्यात येणार आहेत. मात्र, मोठे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पालिका प्रशासनाला राज्य सरकारकडे जावे लागणार असल्याचे सांगण्यात येते आहे. निर्णय घेताना कोणताही ठपका नको म्हणून प्रशासक सरकारला आधी माहिती देण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मी काळजीवाहू महापौर! महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारपासून आपण काळजीवाहू महापौर म्हणून काम पाहणार असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात पालिकेच्या कायद्यात काळजीवाहू महापौर अशी तरतूद नाही. 'पालिकेत मंगळवारपासून लोकप्रतिनिधी नाहीत. मात्र, मी मुंबईला असे वाऱ्यावर सोडणार नाही. मी मुंबईसाठी काम करणार, असा निर्धार महापौरांनी केला आहे. आता माझी नवी इनिंग सुरू होत आहे. पुन्हा जोमाने काम करणार, पक्ष बांधणीसाठी वेळ देणार आहे,' असे महापौरांनी सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Dca7Ojn
No comments:
Post a Comment