म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज, रविवारी सायंकाळी 'आत्मचिंतन' बैठक होत आहे. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष , माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा त्यांच्या पदांचा राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, काँग्रेसकडून ही शक्यता फेटाळण्यात आली आहे. काँग्रेसचा दारुण पराभव झाला की सोनिया आणि राहुल पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राजीनामे देण्याची तयारी दर्शवितात आणि त्यांचा प्रस्ताव बैठकीत फेटाळला जातो, असा पायंडा आता पडलेला दिसतो. त्यामुळे आज, रविवारी होणाऱ्या बैठकीत त्याची पुनरावृत्ती होऊन गांधी कुटुंबातील तिन्ही सदस्यांच्या राजीनाम्यांचा प्रस्ताव फेटाळला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. गांधी कुटुंबाशिवाय काँग्रेस एकजूट राहूच शकत नाही, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील बहुतांश सदस्य गांधी कुटुंबीयांचे निष्ठावंत आहेत. मात्र, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा आणि मुकुल वासनिक या जी-२३ नेत्यांच्या गटातील सदस्यांसोबत उत्तराखंडच्या निवडणुकीत पराभूत झालेले हरिश रावत काँग्रेस पक्षातील असंतुष्टांचा आवाज होण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सायंकाळी आझाद यांच्या निवासस्थानी काँग्रेस असंतुष्टांची बैठक होऊन त्यात राहुल यांचे नेतृत्व अजिबात विश्वासार्ह नसल्याची भावना व्यक्त करण्यात आल्याचे समजते. अध्यक्षपदाची निवडणूक लवकर? राहुल यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे जावीत, यासाठी काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे; पण उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवांमुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आधीच घेण्याची मागणी होण्याची शक्यता आहे. या पराभवांमुळे तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्याचेही नैतिक बळ खचले असून पक्षाचे नेतृत्व करीत असलेल्या गांधी कुटुंबीयांविषयी रोष वाढला आहे. पक्ष नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष राहुल यांनी २५ मे २०१९ रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून अंतरिम अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी काम पाहत आहेत. राजीनाम्यानंतरच्या कालखंडात करोनाची साथ आल्यामुळे काँग्रेसची पक्षसंघटनात्मक निवडणूक सतत लांबणीवर पडत गेली. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या काँग्रेसच्या दयनीय स्थितीवर तातडीने तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी करीत ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील २३ असंतुष्ट नेत्यांनी सोनिया यांना पत्र लिहिले होते. मात्र त्यावरही पक्षश्रेष्ठींनी कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे रविवारच्या बैठकीत यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/fGZesaN
No comments:
Post a Comment