लातूर : जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीवेळी एका बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, हा मृत्यू केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे, असा आरोप बाळाच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रसूती कळाने महिला व्याकूळ होऊन ओरडत असताना शिकाऊ डॉक्टर मात्र हसत होते असंही नातेवाईकांनी म्हटलं आहे. रेणापूर तालुक्यातील धवेली या गावातील रहिवासी असलेले चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या पत्नी रंजना सूर्यवंशी यांना प्रसूतीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दि.१४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रंजना सूर्यवंशी यांची सोनोग्राफी करण्यात आली आणि बाळ आणि आई सुरक्षित असल्याचं सांगण्यात आले होते. मात्र, असं असताना जेव्हा रंजना सूर्यवंशी यांना प्रसूती कळा सुरू झाल्या तेव्हा त्या त्रासामुळे ओरडू लागल्या. मात्र, तिथे असणारे शिकाऊ डॉक्टर हसत होते. तज्ञ डॉक्टर तपासून निघून गेले. बाळाचा जन्म होत असताना डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला आणि बाळाचा मृत्यू झाला. आपल्या लेकीला जीवघेण्या कळा येत असल्याचं रंजना सूर्यवंशी यांच्या आई त्या शिकाऊ डॉक्टरांना सांगत होत्या. मात्र, त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान, जन्मतःच बाळाच्या या मृत्यूला विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर पूर्णपणे जबाबदार आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे. तसेच, आम्ही या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असं शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी म्हटलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aSvlA9u
No comments:
Post a Comment