
नवी दिल्ली : विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या लाजीरवाण्या पराभवानंतर आता भारतीय संघावर जोरदार टीका होत आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माला आता नेतृत्व सोडावे लागणार, अशी जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीवरही दडपण वाढले होते. पण आता रोहितच्या कॅप्टन्सीबाबत निर्णय घेण्यात आला असून बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे.कसोटी जगज्जेतेपद लढत गमावली असली, तरी तूर्तास रोहित शर्माच्या कर्णधारपदास धोका नाही. मात्र, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रोहित शर्मा कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. या दौऱ्यानंतर रोहित भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.दोन वर्षे नाहीचभारतीय संघ पुढील महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. यात दोन कसोटी, तीन वन-डे आणि पाच टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिली कसोटी १२ ते १६ जुलैदरम्यान विंडसर पार्क येथे, तर दुसरी कसोटी २० ते २४ जुलैदरम्यान क्विन्स पार्क ओव्हलमध्ये होणार आहे. रोहित विंडीज दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, या दौऱ्यात फलंदाज म्हणून अपयशी ठरल्यास त्याच्याबाबत कठोर निर्णय घेणे बीसीसीआय आणि निवड समितीस भाग पडेल, असे संकेत दिले जात आहेत. ‘रोहितला कर्णधारपदावरून दूर करणार असल्याची केवळ चर्चा आहे. बीसीसीआय हा निर्णय घेण्याची शक्यताच नाही. मात्र, तो अजून दोन वर्षे नेतृत्व करण्याची शक्यता कमी आहे. कसोटी जगज्जेतेपदाची लढत आता २०२५ मध्ये होईल. त्या वेळी रोहित ३८ वर्षांचा आहे. विंडीजमधील मालिकेतील कामगिरीनंतरच रोहितबाबत निवड समिती चर्चा करील,’ असे सूत्रांनी सांगितले. विंडीजमधील कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ डिसेंबरपूर्वी कसोटी मालिका खेळणार नाही. त्यामुळे कसोटीसाठी नव्या कर्णधाराबाबत विचार करण्यासाठी निवड समिती सदस्यांना पुरेसा कालावधी आहे.रोहितचा खराब फॉर्मएखाद्या कर्णधार अथवा प्रशिक्षकांवर जोरदार टीका होते, त्यांना लवकरच दूर करणार अशी चर्चा होते. त्या वेळी बीसीसीआय कधीही कोणाची उचलबांगडी करीत नाही, याकडे बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्या वेळी रोहित कसोटीसाठी कर्णधार होण्यास तयार नव्हता. मात्र, बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सचिव जय शहा यांनी रोहितला जबाबदारी घेण्यास तयार केले, याचीही आठवण या पदाधिकाऱ्यांनी करून दिली. रोहितने नेतृत्वाच्या दहा कसोटींत ३५.४५ च्या सरासरीने ३९० धावा केल्या आहेत. त्यात एकच शतक आहे. याव्यतिरिक्त त्याने कधीही पन्नास धावाही केलेल्या नाहीत. याच कालावधीत विराटने १० कसोटींत ५१७ धावा केल्या, तर चेतेश्वर पुजाराने १४ डावात ४८२ धावा केल्या आहेत. रोहित, पुजारा आणि कोहली हे काही वर्षातच निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्याहीपेक्षा त्यांच्या वाढत्या वयामुळे पर्यायी खेळाडूंचा विचार आवश्यक असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सात पैकी चार कसोटी जिंकल्या असून, दोन कसोटी गमावल्या आहेत, तर एक कसोटी ‘ड्रॉ’ झाली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CnbUlwK
No comments:
Post a Comment