
वृत्तसंस्था, नवी दिल्ली: आगामी चार आठवड्यांत भारतात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज ‘स्कायमेट वेदर’ या खासगी संस्थेने वर्तवला. यामुळे शेतीवरील परिणामाबाबतही चिंता वाढली आहे. ‘एक्सटेण्डेड रेंज प्रेडिक्शन सिस्टीम (ईआरपीएस) आगामी चार आठवडे म्हणजेच ६ जुलैपर्यंत निराशजनक अंदाज वर्तवत आहे. कृषिप्रधान क्षेत्र कोरडे राहण्याचे अनुमान आहे,’ असे स्कायमेटने सोमवारी नमूद केले. ‘मोसमाच्या सुरुवातीला अपुऱ्या पावसामुळे जास्त प्रमाणात पाऊस पडणाऱ्या भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात कोरड्या दुष्काळाच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे,’ असेही त्यांनी म्हटले आहे. ‘अरबी समुद्रातील बिपर्जय चक्रीवादळाने पहिल्यांदा केरळमधील पावसाचे आगमन लांबवले आणि आता पर्जन्य प्रणालीच्या प्रगतीत अडथळा आणत आहे. द्वीपकल्पाच्या अंतर्गत क्षेत्रात मान्सून पोहोचण्यात अटकाव करत आहे,’ असे या संस्थेने अधोरेखित केले.
आणखी चार आठवडे तुरळक पाऊस
मान्सून साधारणपणे १५ जूनपर्यंत महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणाचा अर्धा भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहार ही क्षेत्रे व्यापतो. परंतु, मान्सूनचा प्रवाह अजूनही या भागांवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत आहे. सद्यस्थितीत मान्सून ईशान्य आणि पश्चिम किनारपट्टीपर्यंत मर्यादित आहे. आगामी काळात बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली उदयास येण्याची चिन्हे नाहीत. स्कायमेट संस्थेच्या अंदाजानुसार आणखी चार आठवडे तुरळक पाऊस पडू शकतो.मान्सून तुरळक राहिल्यास शेतीला फटका
महाराष्ट्रातील खरिपातील शेतीचं गणित हे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. साधारणपणे ७ जूनला मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो आणि त्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यभर पोहोचतो.यादरम्यान शेतकरी शेतीची कामं करत असतात. यंदा मात्र, चार आठवडे तुरळक पाऊस राहिल्यास शेतीवर विपरित परिणाम होऊ शकतो.हलक्या ते मध्यम सरींची शक्यता
मुंबईत मंगळवारी सायंकाळी हलक्या पावसाने उपस्थिती लावली. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या शनिवारपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तसेच दक्षिण कोकणातही हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. त्यामुळे कोकणात मान्सून दाखल झाल्यानंतरही कोकण विभागात सरींची तीव्रता वाढलेली नसल्याने चिंता आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LkUWr1q
No comments:
Post a Comment