म. टा. प्रतिनिधी, ठाणे :अवजड वाहनांसह हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मुंब्रा बायपास तब्बल अडीच महिन्यांच्या दुरुस्ती कामानंतर बुधवारी रात्रीपासून खुला करण्यात आला. आता ठाणे-बेलापूर मार्गासह ऐरोली टोलनाका भागात होणारी अवजड वाहनांची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.पावसाळ्यात दरवर्षी मुंब्रा बायपासची प्रचंड दुरवस्था होते. जागोजागी पडणारे खड्डे आणि येथील रेतीबंदर पुलाच्या भागात पडणारे भगदाड अशा स्थितीमुळे पावसाळ्यात बायपासवरून वाहने चालवणे हे मोठे दिव्य असते. यंदा ४ एप्रिलपासून पावसाळ्यात होणाऱ्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका व्हावी, यासाठी रेतीबंदर पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला होता. त्यानुसार पुलाच्या ६०० मीटरच्या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम पूर्ण झाल्याने बुधवारी उशिरा रात्री हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
दहा मिनिटांसाठी पाऊण तास खर्ची
मुंब्रा बायपास बंद असल्याने जेएनपीटी बंदरातून सुटणारी अवजड वाहने ठाणे-बेलापूर, पूर्व द्रुतगती महामार्गाने घोडबंदर, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतूक करत होती. त्यामुळे अवजड वाहनांच्या लांबचलांब रांगांनी नवी मुंबईच्या दिघा, ऐरोली टोलनाका येथे प्रचंड कोंडी होत असे. या कोंडीत काही मिनिटांच्या अंतरासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास खर्ची पडत होते.मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर देखील परिणाम
मुंब्रा बायपास बंद असल्यानं मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतुकीवर देखील परिणाम होत होता. पुण्याहून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने नेमक्या कोणत्या मार्गानं जाणार याबद्दल माहिती घेण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत होते. कधी कधी मुंब्रा बायपास बंद असल्यानं मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांमुळं देखील वाहतुकीवर परिणाम होत होता. मुंब्रा बायपास बंद असल्यान अवजड वाहनांना प्रवासातून ब्रेक घ्यावा लागत होता. आता मुंब्रा बायपास सुरु होणार असल्यानं प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/IQNkKT9
No comments:
Post a Comment