बीड: एक दोन नव्हे तर तब्बल ३६५ गुन्ह्यांची उकल करणाऱ्या बीड पोलीस दलातील रॉकी नावाच्या श्वानाला अखेरचा निरोप देण्यात आला आहे. हवेत बंदुकीच्या फैरी झाडत या श्वानाला पोलीस दलाने अखेरचा निरोप दिला. स्वत: राज्याचे गृहमंत्री यांनी एक भावूक पोस्ट लिहून ही माहिती दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. आमच्या बीड पोलीस दलातील रॉकी नामक श्वानाचे काल दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी ईश्वराजवळ प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली! दहशतवादी हल्ले, बॉम्बशोधक, बॉम्बनाशक पथके, गुन्ह्यांची उकल आणि सभा बंदोबस्त इ. विषयांच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस दलातील श्वानपथक महत्वाची भूमिका बजावत असते. महाराष्ट्र पोलीस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत. रॉकीने आजपर्यंत ३६५ गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बीड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा एक प्रामाणिक योद्धा आम्ही रॉकीच्या जाण्याने गमावला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. रॉकीने केलेली कामगिरी माझ्यासह बीड पोलीस दलाच्या मनात सदैव घर करून राहील, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. रॉकीचे १५ ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्याच्यावर काल बीड पोलीस दलातील प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी त्याची अंत्ययात्रा काढून नंतर त्याला सलामी दिली. रॉकीच्या सन्मानार्थ हवेत बंदुकीच्या फैरीही झाडण्यात आल्या. त्यानंतर त्याच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील बडे अधिकारी उपस्थित होते.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/31Xgdfn
No comments:
Post a Comment