म. टा. प्रतिनिधी, मुंबई 'माझे काहीही झाले तरी कामाकडे लक्ष दे, देवबाभळीकडे लक्ष दे', हे तिच्या वडिलांचे शब्द... त्यांचा हाच सल्ला पाळून वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी ती रंगभूमीवर उभी राहिली. 'शो मस्ट गो ऑन' म्हणत अभिनेत्री शुभांगी सदावर्तेने आपल्या दुःखाला आवर घातला आणि नाटकाचा प्रयोग तितक्याच यशस्वीपणे पार पाडला. मागील काही दिवसांपासून शुभांगीचे वडील हे आजारी होते. शुक्रवारी त्यांच्या जाण्याने तिच्या डोक्यावरील मायेचा हात दूर झाला. वडिलांचे शुक्रवारी निधन झाल्यावर शुभांगीने शनिवारी नाशिकहून मुंबई गाठली आणि 'देवबाभळी' नाटकाचे विलेपार्ले, डोंबिवलीमधील पूर्वनियोजित प्रयोग केले. 'बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेलात त्याला अजून दोन दिवसही झाले नाहीयेत; पण हिंमत करून प्रयोगाला उभी राहतेय. चार दिवस आधी तुम्ही बोलला होतात. माझे काहीही झाले तरी कामाकडे लक्ष दे, देवबाभळीकडे लक्ष दे. मी बरा झालो की प्रयोगाला येईन. आता प्रत्येक प्रयोगात तुम्ही असाल प्रेक्षक म्हणून', असे शुभांगीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. नाटकाचा दिग्दर्शक याने 'मटा'ला सांगितले की, 'तुकोबांचा एक अभंग आहे ज्यात ते म्हणतात. शेतकऱ्याच्या घरातल्या आपल्या माणसावर काळ आला आणि तेव्हाच रानात पाऊस आला तर तो क्षर देह झाकून त्याला आधी पेरणी करावी लागते. त्याने त्याचे 'रडे'पेरणी करता करता गावे. हे सगळे मला प्रयोगावेळी आठवत होते. कारण त्यावेळी माझ्यासमोर आवली (शुभांगी) रंगमंचावर गात होती. तिच्यातल्या कलावंताला सलाम.'
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2MkJrRc
No comments:
Post a Comment