म. टा. प्रतिनिधी,मुंबई मुंबईत ऐन गर्दीच्या वेळेत लोकल आणि यांची एकाच वेळी रुळावर गर्दी होण्याची म्हणजेच 'बंचिंग'ची समस्या मोठी आहे. मात्र 'बंचिंग'मुळे होणारा खोळंबा टाळून मुंबईकरांचा लोकल प्रवास वेगवान करण्यासाठी रेल्वे दरबारी प्रयत्न सुरू आहेत. सर्व रेल्वेगाड्यांची वाहतूक विनाविलंब व्हावी, यासाठी पश्चिम रेल्वेवर 'दिल्ली पॅटर्न' राबवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अलोक कंसल यांनी घेतला आहे. यानुसार, जोगेश्वरी यार्ड अद्यायावत करून त्याचे टर्मिनसमध्ये रूपांतर केल्यानंतर येथूनच 'तेजस'सारख्या खासगी गाड्या चालवण्यात येणार आहेत. करोनाची लाट ओसरल्यामुळे पूर्ण क्षमतेने लोकल आणि मेल-एक्स्प्रेस धावत आहेत. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत नोकरदार वर्गाची लोकल प्रवासाला मोठी मागणी असते. मात्र या वेळेत लोकलना थांबवून मेल-एक्स्प्रेसना प्राधान्य मिळत असते. त्यामुळे लोकलचा खोळंबा होतो. ही रखडपट्टी सोडवण्यासाठी पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाने जोगेश्वरी येथे टर्मिनस उभारण्याचा तोडगा काढला आहे. टर्मिनस उभारण्यासाठी ७० कोटींचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात आल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. देशभरातून रेल्वे गाड्या दिल्लीत येतात. दिल्लीतील चार रेल्वे स्थानकावरून या प्रवासी रेल्वे गाड्यांची वाहतूक होत असल्याने ती विभागली जाते. त्यानुसार मुंबईतही सेंट्रल, दादर आणि वांद्रे टर्मिनस येथून लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. येत्या काळात रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याने टर्मिनसची क्षमता वाढवण्यात येत आहे, असे महाव्यवस्थापक कंसल यांनी स्पष्ट केले. रेल्वे मंत्रालयाचा खासगी गाड्या अधिकधिक चालविण्याकडे कल आहे. यामुळे खासगी गाड्यांसाठी जोगेश्वरी टर्मिनस असे नियोजन दिसत आहे. तेजस एक्स्प्रेससह अन्य निवडक मेल-एक्स्प्रेस या टर्मिनवरून चालवण्यात येणार असल्या तरी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या गाड्यांबाबत अधिक स्पष्टता येईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ९५ टक्के वक्तशीर मुंबई उपनगरीय रेल्वेवर सध्या पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू आहे. करोनापूर्व काळाप्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू झाल्या आहेत. अशा स्थितीतदेखील पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय लोकलचा वक्तशीरपणा हा ९५ टक्के आहे, असे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापनक अलोक कंसल यांनी सांगितले. जोगेश्वरी का? - सध्या जोगेश्वरी यार्डामधून मालगाड्या चालवण्यात येत आहेत. देशातील सर्व ठिकाणाहून ऑटोमोबाइल तसेच सिमेंट यांची वाहतूक येथून हाताळली जात आहे. - यामुळे नवे टर्मिनस उभारण्यासाठी मोठ्या निधीची गरज नाही. - कमी वेळात हे काम करणे शक्य आहे. - जोगेश्वरीला पश्चिम द्रुतगती महामार्गाची जोडणी असून मेट्रोदेखील प्रस्तावित आहे. टर्मिनस ते घर या प्रवासासाठी वाहतुकीचे अन्य पर्यायदेखील उपलब्ध होणार आहेत. असे असेल टर्मिनस- - जोगेश्वरी टर्मिनसमध्ये एक फलाट आणि तीन मार्गिका उभारून तिथून मेल-एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन - स्थानक अद्ययावत करताना प्रवाशांसाठी सर्व आधुनिक सुविधा उभारणार - टर्मिनस उभारण्यासाठी ७० कोटींचा प्रस्ताव - अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3CtSnrS
No comments:
Post a Comment