सुनील मिसर, वाशीम : पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांत मुरूम, गिट्टी व डांबर टाकून दुरुस्ती केली जाते. नागपूर-औरंगाबाद ‘एक्स्प्रेस वे’वरील वाशीम-किन्हीराजादरम्यान हे काम सुरू आहे. पण, या महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरुमाऐवजी चक्क मातीचा वापर केला जात असल्याचे ‘मटा’च्या पाहणीतून पुढे आले आहे. मातीच्या या वापरामुळे खड्डे क्षणात नव्याने तयार होऊन महामार्गावर चिखल पसरणार असल्याचा धोका यानिमित्ताने व्यक्त होत आहे.वाशीम-किन्हीराजा हा जवळपास २२ किलोमीटरचा मार्ग आहे. या महामार्गावरून जाताना रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ता अशी स्थिती दिसते. मंगरुळपीर-वाशीम हा महामार्ग बांधला जात असताना कारंजाकडून वाशीमला येण्यासाठी हा अत्यंत योग्य मार्ग होता. मंगरुळपीर-वाशीम हा रस्ता तयार झाल्यानंतर हा भाग दुर्लक्षित झाला. हा खड्डेमय महामार्ग दुरुस्त करण्यासाठी २५ गावांतील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. वाढता जनक्षोभ पाहता रिसोडचे आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमित झनक, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. दिलीप सरनाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष उद्धव पाटील गोडे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. रस्त्याचे काम मात्र सुरू झाले नाही.आता पावसाळ्यापूर्वी महामार्गावरील खड्डे दुरुस्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवात केली आहे. मुरूम किंवा गिट्टी, डांबर यांचा वापर न करता वाशीम-किन्हीराजादरम्यान खड्डे बुजविण्यासाठी चक्क काळ्या मातीचा वापर केला जात असल्याचे सर्रासपणे दिसत आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या भागातही सर्वसाधारणपणे हेच चित्र आहे. नियमाचे हे उल्लंघन या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येकाला दिसत असताना कुणीही आवाज उठविलेला नाही.पुलावरून जाताना चुकतो काळजाचा ठोकानागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस वे वरील किन्हीराजावरून मालेगावकडे येत असताना जऊळकासमोर काटेपूर्णा नदीवर ब्रिटीशकालीन पूल आजही आपल्या पुरातन वैभवाची साक्ष देत उभा आहे. या पुलाखालून काटेपूर्णा नदी वाहते. पुलावरून या भागाचे नैसर्गिक विहंगम दृश्य अनुभवता येते. पण, या पुलावरून मार्गक्रमणास सुरुवात करताना काळजाचा ठोका चुकतो. या पुलावरील डांबर ठिकठिकाणी उखडले गेले आहे. पुलाचे लोखंडी गज उघडे पडल्यामुळे अपघाताला निमंत्रण देत आहेत. या मार्गावर दररोज ट्रॅव्हल्स, एसटी बस, खासगी वाहने सातत्याने धावत असतात. तरीही दुरुस्ती केली जात नसल्याने संताप आहे. कारंजा -मानोरा मार्गावरील अडाण नदीवरील पुलाचीही हीच अवस्था आहे. या पुलावरील रेलिंगची दुरवस्था झाली आहे. तर पुलाच्या कठड्याचा काही भाग अक्षरशः तुटला. पण आजही या ठिकाणी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे.अधिकारी म्हणतात, ‘सध्या काही सांगू शकत नाही’!‘नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस वेवरील जउळकासमोरील काटेपूर्णा नदीवरील पूल हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या पुलाविषयी एनएचआयच स्पष्टीकरण देऊ शकते. वाशीम-किन्हीराजा या मार्गाचे काम लवकरच सुरू होईल. या मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सध्या तरी काहीही सांगू शकत नाही. कारण मी महिनाभरापासून सुटीवर आहे,’ असे सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता मिठ्ठेवाड यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/q6Ci5va
No comments:
Post a Comment