
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : दिल्लीत संसद अधिवेशन सुरू असतानाच शिवसेना (उबाठा) नेते बुधवारी दिल्लीत पोहोचले. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र, बुधवारी रात्री केंद्रीय राज्यमंत्री व एकनाथ शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी झालेल्या स्नेहभोजनाला ‘उबाठा’ पक्षाच्या तीन खासदारांनी लावलेली हजेरी, पक्षाच्या खासदारांमधील वाढती अस्वस्थता, त्याआधी नवनिर्वाचित आमदारांच्या संसदीय प्रशिक्षणादरम्यान ‘उबाठा’ गटाच्या सहा आमदारांनी शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या कथित ‘भ्रमणध्वनी’ चर्चा या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठीच दिल्लीला धाव घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.आदित्य ठाकरे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यात नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी अरविंद सावंत, संजय जाधव, संजय देशमुख, राजाभाऊ वाजे आदी लोकसभा सदस्य उपस्थित होते. हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील व व्यक्तिगत कारणामुळे अनिल देसाई उपस्थित नव्हते. मंत्री जाधव यांच्या घरी बुधवारी रात्री झालेल्या स्नेहभोजनाला जाधव, आष्टीकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी हजेरी लावली, तर आष्टीकर यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे हे दोघे जण उपस्थित होते. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडील स्नेहभोजनाला संजय दिना पाटील उपस्थित होते. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी राऊत यांच्या घरी खासदारांची बैठक घेतली. त्यात ‘ऑपरेशन टायगर’वरही चर्चा झाली.दिल्लीत अन्य पक्षीयांच्या गाठीभेटी किंवा स्नेहभोजनासाठी जाताना पक्षाच्या नेत्यांना पूर्वकल्पना द्यावी, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितल्यावर काही खासदार नाराज झाले. त्यांच्यातील काहींनी, 'केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः बोलावल्यानंतर राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून जावे लागते, असे ठाकरे यांना तोंडावरच सांगितल्याचे समजते. 'उबाठा' गटाच्या अन्य खासदारांची नाराजीही वेळोवेळी दिल्लीत दिसते. एका खासदारांच्या मते साधे संसदेत बोलण्याची संधी मिळावी यासाठी पक्षात नेमके कोणाशी बोलाये, याचीही स्पष्टता नाही. संसदेत राष्ट्रवादी (शप.) नेत्या सुप्रिया सुळे, काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल राज्याच्या खासदारांना बोलण्याची संधी मिळावी, यासाठी थेट लोकसभाध्यक्षांपर्यंत जातात. पण उबाठा गटाच्या खासदारांना याबाबत पक्षात दाद मागूनही उपयोग होत नाही अशी खंत या खासदारांनी व्यक्त केली.संजय राऊत यांचे समर्थन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नुकतेच कौतुक केल्याने संजय राऊत यांनी थेट पवार यांच्यावर टीका केली होती. त्या भूमिकेशी सहमती दर्शवताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'कोणी कोणाचे कौतुक करावे हा त्यांचा विषय आहे. संजय राऊत यांनी काल यावर उत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली आहे. अनेक लोक पक्ष फोडतात, पण राग या गोष्टीचा आहे की शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याचे व त्यांनी दिलेले नाव, चिन्ह चोरण्याचे पाप केले.'
from Marathi News: मराठी बातम्या, Delhi Election 2025-26, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/U54SDtG
No comments:
Post a Comment