दीपक पडकर, बारामती : बारामती तालुक्यातील पावसाने रौद्ररुप धारण केले आहे. अतिवृष्टी झाल्याने काटेवाडी परिसरात ७ आणि बारामती शहरातील १ असे नागरिक पावसाच्या पाण्यामुळे अडकले होते. अथक प्रयत्नानंतर या ८ नागरिकांची बचाव पथकाच्या वतीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे, अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली आहे.
शेतांना तळ्याचे स्वरूप
बारामती तालुक्यात रविवारी २२ मे ला पडत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शेती पाण्याखाली गेली आहे. शनिवार, रविवार दिवस रात्र पडत असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. यामुळे संसारोपयोगी साहित्यासह धान्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर सर्वच ओढे, नाले, विहिरी तुडुंब झाल्या असून शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. नीरा डावा कालवा फुटल्यामुळे बाधित झालेल्या काटेवाडी या गावातील, अतिवृष्टीमुळे बाधित नारोळी, कोरोळी येथील काही कुटुंबे तसेच बारामती शहरातील तीन धोकादायक इमारतीमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदीपात्र, कॅनॉल परिसरात जाऊ नये, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, आपत्कालीन परिस्थितीच्या काळात प्रशासनाशी संपर्क साधून प्रशासनास सहकार्य करावे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले आहे.बारामतीसह इंदापूर आणि दौंड तालुक्यांत पावसाने कहर केला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. तर पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. तर पुण्यातील भिगवणमध्येही ट्रक पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा थरार पाहायला मिळाला. आणि पुणे-सोलापूर महामार्गावर इन्होवाही वाहून गेली होती. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.from Marathi News: मराठी बातम्या, Latest Marathi Breaking News & Headlines, Election 2025 Live in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/v6iupFC
No comments:
Post a Comment