पुणे : ज्येष्ठ समाजसेविका आणि 'अनाथांची माय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने पुण्यात निधन झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सिंधूताई यांच्या जाण्याने हजारो मुलं अनाथ झाली आहेत. ( Passes Away) सिंधूताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा येथे झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवले. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधूताईंनी १९९४ मध्ये पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. मांजरी येथे त्यांनी बाल निकेतन संस्था सुरू केली. खडतर प्रसंगाना तोंड देत सिंधूताईंनी या संस्थांच्या माध्यमातून अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. आत्तापर्यंत हजारो अनाथ मुलांना त्यांनी जगण्याचा मार्ग दाखवला आहे. अनेक युवक-युवतींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करून त्यांचे विवाह या संस्थांकडून करण्यात आले. लग्नानंतर सासरी होणारा छळ स्वीकारून, आहे त्या आयुष्याला सामोरं जाणं हा पर्याय अनेकजणींनी आपल्या समाजात स्वीकारला. माहेरी परत जाण्याची सोय नसल्याने सासरी न पटणाऱ्या स्त्रियांना आला दिवस त्यांच्यासोबतच साजरा करणं यावाचून गत्यंतर नसे. पण मूळच्या विदर्भामधील चिखलदऱ्याच्या सिंधूताई मात्र यास अपवाद ठरल्या. प्राप्त परिस्थितीला शरण न जाता, त्यास केवळ 'प्राक्तन' न मानता आव्हान म्हणून त्यांनी आयुष्याकडे पाहिलं. समाजातील अन्यायग्रस्त स्त्रियांना आशेचा प्रकाश दाखवला. स्वातंत्र्य ही देण्याघेण्याची वस्तू नाही. जीवनमान उंचावण्यासाठी आपणच स्वातंत्र्याचा जाणीवपूर्वक अवलंब करायला हवा हे त्यांनी सिद्ध केलं. नवऱ्याने नाकारून घराबाहेर काढल्यानंतर गाईच्या गोठ्यात त्यांनी मुलीला जन्म दिला. दगडाने तोडलेली नाळ आणि मुलीने फोडलेला टाहो हे दोन्ही प्रसंग त्या शेवटपर्यंत विसरू शकल्या नाहीत. पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी दहा दिवसांचं बाळ घेऊन त्यांना बराच संघर्ष करावा लागला. त्यातूनच त्या अनाथांसाठी संस्था उभ्या करू शकल्या. आनंद, दु:ख, अवहेलना, अपमान, उपेक्षा पचवत त्यांनी आश्रमात येणाऱ्या निराधार, गरीब आणि गरजू मुलांसाठी अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची सोय पुरवली. असंख्य अडचणींना तोंड देणाऱ्या अनेक महिला आपण पाहतो, ज्या एकतर अगतिक तरी असतात किंवा निराशेने ग्रासून गेलेल्या असतात. पण काहीजणी खचून न जाता अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या, आत्महत्येचा नेभळट मार्ग न पत्करता समाजालाच धैर्याची व आदर्शाची अनुभूतीही देतात. आपबितीतून सिंधूताईंनी अनेक संस्था उभारल्या. सप्तसिंधू महिला आधार बाल संगोपन संस्था (पुणे), सन्मती बाल निकेतन संस्था (पुणे), वनवासी गोपाल कला शिक्षण व क्रीडा मंडळ (चिखलदरा), अभिमान बालभवन, ममता बाल सदन अनाथाश्रम अशा अनेक संस्थांचा संसार चालवणं ही सोपी गोष्ट नाही. सच्चाईनं काम करणाऱ्यांमागे पुरस्कारही आपोआप येतात. सिंधूताई सकपाळ यांच्या कार्याचा सर्वच स्तरातून गौरव करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या वृत्ताने समाजमन सुन्न झालं असून अनाथांची माय हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3ETAnZc
No comments:
Post a Comment